लोकसभा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून दुपार पर्यंतचा कल पाहता इंडिया आघाडीचे २३३ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमताचा आकडा २७२ असल्याने इंडिया आघाडीने मोठी हालचाल सुरु केलीय. यातच इंडिया आघाडीचे नेते शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीत आल्यानंतर तुम्हाला उपपंतप्रधान पद देऊ, अशी ऑफर पवारांनी नितीश कुमार यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींसह भाजपचं चांगलंच टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार हे भाजपप्रणित NDA आघाडीत आहे. बिहारमध्ये त्यांना चांगल्या जागांवर यश मिळताना दिसून येत आहे. आतापर्यंत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे १५ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे भाजपला बहुमत मिळण्याची कमी शक्यता आहे. शेवटचे कल हाती आले तेव्हा भाजपचे २४० जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.
निवडणुकांच्या कलानुसार, इंडिया आघाडीचे २३३ जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमताचा आकडा २७२ असल्याने इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहे. एनडीए आघाडीत असलेला जेडीयू पक्ष आपल्यासोबत आला, तर भाजपला बहुमत गाठता येणार असा इंडिया आघाडीचा अंदाज आहे.
हीच बाब लक्षात घेता शरद पवार यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत येण्याची ऑफर दिल्याचं कळतंय. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं कळतंय. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांची भेट घेण्याचं ठरवलं होतं. पण नितीश कुमार यांनी भेट नाकारल्याची माहिती आहे.
लोकसभा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत इंडिया आघाडीतील नेते एनडीएमधील घटक पक्षांसोबत संवाद साधणार आहे. तसेच आंध्र प्रदेशातील टीडीपी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत संवाद साधणार आहेत. याची सर्व जबाबदारी शरद पवार यांच्यासारख्या बड्या नेत्यावर दिल्याची माहिती समोर येत आहे.















Discussion about this post