मुंबई । राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होणार आहे. एकीकडे राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला असून अशातच हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
राज्यात शुक्रवारपासून (५एप्रिल) अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पाऊस पडणार असताना तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
का पडणार पाऊस
राज्यात हवेची द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. आद्रता वाढल्यामुळे पाऊस पडणार आहे. ५ एप्रिलपासून चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक तर काही मुसळधार पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात वातावरण बदलले असताना तापमान वाढणार आहे. या काळात राज्यातील तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढणार आहे.
अशी तयार झाली रेषा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जात आहे. त्याचा परिणाम पावसावर होणार आहे. यामुळे ५ ते ८ एप्रिल दरम्यान उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागांत पाऊस पडणार आहे. मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. शेतात काढून ठेवलेले रब्बी पीक वाया गेले होते. आता पुन्हा पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे.
Discussion about this post