मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जाण्या-येण्याचा, राहण्या-खाण्याचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूरला जावं, त्यांनी लडाखला जावं, पण त्यांनी तिथे जाऊन परिस्थिती पाहावी. त्यांनी एखादा बॉलिवूड निर्माता शोधून मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अरुणाचल प्रदेश आणि दार्जिलिंगला जावं. निर्वासित काश्मिरी पंडितांना भेटावे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बॉयकॉट बॉलीवूड म्हणणारे बॉलीवूडच्या नादी लागलेत, त्यामुळे एखाद प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा, असं म्हणत त्यांनी यावेळी निशाणाही साधला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अद्याप संभ्रम कायम आहे. यावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीला प्रश्न विचारता मग महायुतीचे काय बरं चाललंय का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मविआमध्ये आमचं सगळं बरं सुरू आहे. जागावाटपाबाबत भांडणं नाहीत, थोडीशी खेचाखेच आहे. जागावाटपावर थोडी खेचाखेच होतेच, भाजपसोबत आमची युती होती, तेव्हा सुद्धा खेचाखेच व्हायची, असंही ठाकरे म्हणाले.















Discussion about this post