जालना । मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलांच्या घशाखाली घासही जात नाही. जेवण करावे म्हणून पालकही त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र, पालकांचा हाच लाड मुलांच्या जीवावर बेततानाही दिसून येतो. अशीच एक घटना जालन्यातुन समोर आलीय.
जालन्यात मोबाईलच्या स्फोटामुळे एका 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. समर्थ तायडे असं या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे राहणारे तायडे कुटुंबिय नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात मामाच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत चिमुकला समर्थ देखील होता. दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तायडे कुटुंब सोमवारी 4 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. त्याचवेळी नातेवाईकांच्या मुलासोबत खेळत असताना चिमुकला समर्थ याने मोबाईलची खराब झालेली बॅटरी कानाला लावली.
त्याच क्षणी भयानक स्फोट झाला. या स्फोटात समर्थच्या कानाला तसेच बोटाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थला तपासून मृत घोषित केले.















Discussion about this post