जळगाव । जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर चाळीसगावमधून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर येत आहे. चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या ‘शहर विकास आघाडी’चे ११ नगरसेवक आणि २ अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी या निवडणुकीतील मतदानावर थेट बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या ‘राजगड’ या निवासस्थानी एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत चाळीसगाव शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी पक्षाची आणि सर्व नगरसेवकांची भूमिका मांडली. यावेळी चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आणि दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी एकत्रितपणे जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले.बहिष्काराच्या या टोकाच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सौ. सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी भाजप उमेदवारावर थेट आणि गंभीर आरोप केले. ते म्हणाले,भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मतदारांकडे साधा फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन मत मागण्यासाठीही आलेला नाही. जो उमेदवार मत मागायलाही तयार नाही, अशा उमेदवाराला आम्ही मत तरी कसे द्यावे? हा आमच्यासमोरील मोठा प्रश्न आहे.
पुढे बोलताना त्यांनी इतर अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवरही तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक थेट भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची आणि लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याच कारणांमुळे आम्ही या निवडणुकीच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
निवडणुकीच्या अगदी तोंडावर चाळीसगावमधील १३ नगरसेवकांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानावर टाकलेल्या या बहिष्कारामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आता कोणते नवीन वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post