धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या एका मुलासह दोन जुळ्या मुलींना घेऊन उपळी बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीवर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, आता या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मृत्यूपूर्वी अश्विनी पौळ यांनी आपल्या मुलांसोबत नळदुर्ग किल्ल्याच्या दरवाजाजवळ केक कापल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एफआयआरमधून अश्विनी पौळ यांच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. अश्विनी यांचे पती मनोहर अंकुश पौळ, सासू कालिंदा पौळ, सासरे अंकुश पौळ आणि पतीची आत्या विमलाबाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप अश्विनी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत केला आहे. या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी आपल्या जिद्दीवर सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलात नोकरी मिळवली होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नोकरीसाठी मुंबईत गेल्यानंतर अश्विनी यांनी आपल्या एका मुलीला माहेरी ठेवले होते. त्या दुसरी मुलगी, मुलगा आणि पतीसोबत मुंबईत राहत होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या पतीकडून अश्विनी यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
“तू एवढा वेळ बाहेर राहत जाऊ नकोस, नोकरीच्या नावाखाली कुठे जातेस?” अशा शब्दांत पतीकडून सातत्याने संशय व्यक्त केला जात असल्याचे अश्विनी यांनी फोनवरून माहेरच्या कुटुंबीयांना सांगितले होते, असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींकडून होणारा कथित छळ, पतीकडून घेतला जाणारा संशय आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे अश्विनी त्रस्त असल्याचे त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, एफआयआरमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासली जात आहे. या तपासातून अश्विनी पौळ यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमकी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post