मुंबई । दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर तुफान हल्ला चढवला. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात ठाकरे-पवार हेच दिसत आहेत. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
सध्या लोकशाही टिकविण्यासाठी निकराचा लढा सुरु आहे. हे महाभारत त्यासाठीच सुरु आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी हा लढा सुरु आहे, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. महाराष्ट्रात भगवी लहर आहे. राज्यासह देशात बदल नक्की होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. ”दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू.” अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
‘आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणाने आणि मला बहुतेक सभांतूनही असं जाणवतंय की, आम्ही तर बोलत असतोच, पण लोकांनाही आता सगळं कळलेलं आहे. एखाद्या मुद्याला सुरुवात केली की, लोकच समोरून एकेक विषय बोलत असतात. म्हणजे जागृती हा विषय झालेला आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल माझी रायगडला सभा होती. पूर्वी ते एक नाटक होतं ‘रायगडाला जेव्हा जाग येते.’ आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे, असा दावा ठाकरे यांनी केला.
मी मुद्दामहून आता मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. असा टोला उद्धव टाकरे यांनी लगावला. त्या दोघांनी असा दौरा करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे, असे ते म्हणाले.
Discussion about this post