मुंबई । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवण्याची रणनीती आखली आहे; पण शिवसेनेला (ठाकरे) त्यापूर्वीच कोकणात धक्का बसण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला (ठाकरे) ‘जय महाराष्ट्र’ केल्याने साळवी पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचे निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. साळवी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. साळवी यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेतली. उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, तालुकासंघटक,महिला तालुकासंघटक, माजी शिक्षण सभापती, युवती तालुका अधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित होते. पक्ष त्यागाबाबत त्यावेळी विचारविनिमय झाल्याचे समजते.
कोकण हा शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेड-गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता ठाकरेंची शिवसेना हद्दपार झाली. शिवसेनेने ही कसर भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून (ठाकरे) साळवी, तर शिवसेनेकडून किरण ऊर्फ भैय्या सामंत आमनेसामने होते. ‘पराभूत झालो, तरी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून मी पालकमंत्री होईन,’ असा दावा साळवी यांनी त्यावेळी केला होता; परंतु राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश केला, तर विधान परिषदेवर संधी मिळेल; मतदारसंघात विकासकामे करता येतील. त्यामुळे सर्वांनी सोबत यावे, असे आवाहन साळवी यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. ६ जानेवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे समजते. पदाधिकारी मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिकेत आहेत.
Discussion about this post