जळगाव । जळगाव रेल्वे स्थानकावर आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध समविचारी संघटनांच्या वतीने तिरंगा रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता आरपीएफ व स्थानिक पोलिसांनी मानवी साखळी करून आंदोलकांना रोखले, त्यामुळे आंदोलन प्रत्यक्षात होऊ शकले नाही.
या आंदोलनातून आंदोलकांनी अजित पवार यांच्या कथित प्लेन क्रॅशमध्ये झालेल्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली.
यासोबतच नाशिक येथे 26 जानेवारी रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याचा आरोप करत, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच त्यांचे मंत्रिपद रद्द करण्यात यावे, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी पोलिसांनी आधीच चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलक रेल्वे रुळांच्या दिशेने सरकत असतानाच पोलिसांनी मानवी साखळी करून त्यांना अडवले. यावेळी घोषणाबाजी झाली, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
या घटनेमुळे काही काळ जळगाव रेल्वे स्थानक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेत पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.















Discussion about this post