चोपडा – भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने चोपड्यात जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 जून 1875 रोजी झाला होता. बालवयातच त्यांनी इंग्रजांविरोधात लढा सुरू करून जनजाती समाजाला एकत्र आणत “बिरसायत”च्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे धडे दिले. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याने ब्रिटिश सत्तेला धास्ती बसली होती.
या प्रेरणादायी कार्याची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी राज्यभर जनजाती चेतना परिषदा आयोजित केल्या जात आहेत. त्यापैकी चोपड्यातील चेतना परिषद ही राज्यातील पहिली परिषद ठरणार असून, ती 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खेतेश्वर मॅरेज हॉल, शिरपूर रोड येथे होणार आहे.
या परिषदेस नागपूर येथील विदर्भ चेतना परिषदेचे संयोजक प्रकाश गेडाम, पुणे येथील क्षेत्र सहहितरक्षा प्रमुख युवराज लांडे आणि भुसावळ येथील प्रांत सहसचिव काशीराम बारेला हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर शिवपंथ परिवाराचे थावऱ्या पावरा हे प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
परिषदे दरम्यान जनजाती समाजाचा गौरव, अस्मिता, अस्तित्व आणि विकास या विषयांवर सखोल चिंतन होणार आहे. चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यांमधील जनजाती बांधवांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
या चेतना परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष भाईदास सोनवणे आणि सदस्य ज्ञानेश्वर भादले, डॉ. रवींद्र सोनवणे, प्रेमसिंग बारेला, बाबुराव पाटील, प्रताप पावरा, दिलीप बारेला, संजय पवार, प्रवीण बारेला आणि दिनेश बारेला हे प्रयत्नशील आहेत. समितीने सर्व जनजाती बांधवांना या परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.















Discussion about this post