जळगाव । जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता उदय वाघ यांच्या अभ्यासू आणि धडाडीच्या संसदीय कामकाजाची राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मोठी दखल घेतली गेली आहे. लोकसभेतील त्यांच्या अत्यंत प्रभावी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना सलग दुसऱ्यांदा देशातील प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. संसदेतील त्यांचा सक्रिय सहभाग, जनतेच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सातत्यपूर्ण लोकहिताच्या कामांचा गौरव करण्यासाठी हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
संसदेतील कामकाजात खासदार स्मिता वाघ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ९६ टक्के उपस्थिती नोंदवली. याशिवाय त्यांनी २६९ प्रश्न उपस्थित करून विविध लोकहिताच्या मुद्द्यांना संसदेत आवाज दिला. तसेच ५३ चर्चांमध्ये सहभाग घेत मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. संसदीय प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावत त्यांनी पाच खासगी विधेयकेही सादर केली.
त्यांच्या अभ्यासू, समर्पित आणि जनतेप्रती उत्तरदायी कार्यशैलीची दखल घेत ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, पुरस्कार जाहीर होताच भाजप कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांकडून खासदार स्मिता वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याची संसदीय पातळीवर पुन्हा एकदा देशभरात चर्चा होत आहे.















Discussion about this post