रावेर । जळगावच्या रावेर तालुक्यातील मोहगण-आहीरवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी अचानक जमिनीला हादरा बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. सकाळी सुमारे ७.५७ वाजता भूकंपाचा हा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती आहे.
अचानक घरांना आणि जमिनीला कंप जाणवल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. मोहगण, आहीरवाडी आणि परिसरातील काही भागात या धक्क्याची जाणीव झाली. काही वेळातच भूकंप झाल्याची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू गंगापुरी धरणाजवळ जमिनीखाली असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान, रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांनी भूकंपाच्या घटनेला दुजोरा दिला आहे. भूकंप सौम्य स्वरूपाचा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेतली जात असून, भूकंपामुळे कुठे नुकसान झाले आहे का, याची पडताळणी सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post