मुंबई । एकीकडे थंडी कमी होऊन उकाडा वाढला असताना त्यातच राज्यातील काही भागातही पाऊस सुरु आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मोठी गारपिट झाली. दरम्यान, आजही भारतीय हवामान विभागाने गारपिटीच्या पावसाचा मोठा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आज अवकाळी पाऊस आणि गारपिटी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. काही भागात गारपिटीसोबतच जोरदार वारेही सुटेल. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याचा इशारा देण्यात आला. चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावेल.
परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यातील सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झालाय. यानंतर गहू, ज्वारी, हरभरा पिकाचे नुकसान झाले. परभणीच्या दैठना परिसरातील अल्पभूधारक शेतकरी हनुमान कच्छवे यांचा तीन एक्कर ज्वारीचा प्लॉट भुईसपाट झाल्याने कच्छवे यांचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहिल. यासोबतच हलका पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे गजानन महाराज यात्रेत एकच गोंधळ उडाला. अचानक आलेल्या पावसामुळे यात्रेतील विक्रेते व दुकानदारांची मोठी धावपळ उडाली असून अनेकांच्या दुकानांचे व साहित्याचे नुकसान झाले आहे.















Discussion about this post