पुणे – राज्यात पुढील २४ तासांत थंडीचा जोर कमी होऊन कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्यानंतर कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊन हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, आज अहिल्यानगर येथे सर्वात कमी ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
लक्षद्वीप आइलैंड व लगतच्या मालदीव भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज अग्नेय अरबी समुद्र व लक्षद्वीप भागावर आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर दि. २२ आणि २३ नोव्हेंबरला कोकण-गोव्यात तर दि. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस पावसामुळे कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अवकाळी पावसानंतर पुढील दोन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. तर हवामान कोरडे राहील. दरम्यान, गुरुवारी (दि. २०) अहिल्यानगर पाठोपाठ मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ झाल्यामुळे ७ अंशापर्यंत खाली गेलेला थंडीचा पारा ९ ते १२ अंशाच्या आसपास नोंदविले गेले.
राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान
अहिल्यानगर ९.४, पुणे आणि वाशिम ११, जळगाव ११.२, गोंदिया आणि यवतमाळ ११.६, छत्रपती संभाजीनगर ११.९, परभणी १२, नागपूर १२.२, महाबळेश्वर १२.४, अमरावती १२.७, अकोला १२.८, बुलढाणा १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.















Discussion about this post