पाचोरा । सध्या पाचोऱ्याचे आजी आणि माजी आमदार आमने सामने आले आहे. यामागचं कारण म्हणजे गत सप्टेंबर महिन्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर त्या मागणीला यश आले आणि राज्यातील सरसकट मदत जाहीर झालेल्या तालुक्यांच्या यादीत दोन्ही तालुक्याचा समावेश झाल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. मात्र भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यावरून आमदार पाटील यांना आता लक्ष्य केले आहे. यामुळे आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
पाचोरा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र, पाचोरा महसूल विभागातील अव्वल कारकून अमोल भोई याने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम थेट इतर खात्यांवर वळवून तब्बल दोन कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणावर आमदार किशोर पाटील यांनी अद्याप मौन का बाळगले आहे, असा प्रश्न माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही ना, म्हणूनच आमदार पाटील शांत आहेत का, अशीही शंका माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतली आहे. हा गैरव्यवहार केवळ दोन कोटी रुपयांपुरता मर्यादित नसून, यापूर्वीही अशा स्वरुपाचे प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकूण सुमारे आठ ते १० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचे माजी आमदार वाघ यांनी स्पष्ट केले. आमदार पाटील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करतात. मग दोन कोटींच्या घोटाळ्यावर का बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले.















Discussion about this post