नवी दिल्ली । अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सोमवारपासून सुरू होत असून संसदेतील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा अध्यक्षांविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता असून त्यामुळे अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विरोधकांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के. सुरेश आणि मल्लू रवी यांच्याकडून हा प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे. अध्यक्षांचे सभागृहातील वर्तन, विरोधकांना बोलण्याची संधी न देणे तसेच महिला खासदारांबाबत झालेल्या वक्तव्यांवर कारवाई न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धस्थिती, इराणबाबत भारताची भूमिका, रशियाकडून तेल खरेदी तसेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनासारख्या मुद्द्यांवरूनही संसदेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.
लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यासाठी किमान ५० खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यानंतरच प्रस्तावावर चर्चा व मतदानाची प्रक्रिया सुरू होते. आवश्यक पाठिंबा न मिळाल्यास प्रस्ताव अमान्य ठरतो.संविधानानुसार प्रस्तावावर चर्चा होत असताना अध्यक्षांना सभागृहात उपस्थित राहून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. मात्र या चर्चेदरम्यान ते सभागृहाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. मतदानाची वेळ आल्यास इतर सदस्यांप्रमाणे स्वयंचलित मतदान प्रणालीऐवजी त्यांना स्लिपच्या माध्यमातून मत नोंदवावे लागते.
सध्या लोकसभेतील संख्याबळ सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पराभूत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post