जळगाव । नैराश्यातून तरुण व्यावसायिकाने जळगाव शहरातील मेहरून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. विनय अशोक देशमुख असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय
याबाबत असे की, जळगाव शहरातील मोहन नगरात राहत असलेला विनय देशमुखचे शहरात झेरॉक्सचे दुकान होते, तर त्याचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. गेल्या काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे कळताच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेत असताना विनय मेहरून तलावावर गेल्याची माहिती मिळाली. तलावाच्या परिसरात त्याची दुचाकी आढळल्याने त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. तात्काळ कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली.
मेहरून तलावात आढळला मृतदेह
दिवसभर शोधमोहीम सुरू होती, मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाने एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post