जळगाव : तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.
मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते.
दोन दिवसांपासून मासे मरत होते, पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे















Discussion about this post