जळगाव – राज्यातील हवामानात जलद बदल दिसत असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची तीव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सकाळच्या वेळेस गारठा प्रकर्षाने जाणवत असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात राज्यात सरासरीपेक्षा अधिक थंडीचा अनुभव येऊ शकतो. कमाल आणि किमान तापमान सामान्य पातळीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, अनावश्यकरीत्या थंडीत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढत असून पुणे शहर व घाटमाथ्यावर शीतलहरीची शक्यता दर्शवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते, तर सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही तापमानात मोठी घट आढळत आहे. सकाळी अनेक भागांमध्ये दाट धुक्याचे प्रमाण वाढले आहे.
मराठवाड्यात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस मजबूत होत असून नाशिक जिल्ह्यात तापमानात सर्वात मोठी घसरण नोंदली गेली आहे. विदर्भातही थंडीची स्थिती तीव्र होत असून नागपूरमध्ये धुके आणि अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांतही तापमानात सतत घट नोंदली जात आहे.
राज्यभर वाढत असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.















Discussion about this post