जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद आणि सबगव्हाण या दोन्ही टोल प्लाझावर १२ ऑगस्टपासून नवीन सुधारित दर लागू करण्याची घोषणा केली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या सूचनांनुसार एकेरी, परतीचा प्रवास आणि स्थानिक पाससाठी वाहनांच्या श्रेणीनुसार हे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत.
सबगव्हाण टोल नाका (तरसोद-फागणे महामार्ग ५३):
सबगव्हाण टोलवरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना (कार, जीप) एकेरी प्रवासासाठी १७० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागतील. हलकी व्यावसायिक वाहने (२७० रु. एकेरी / ४०५ रु. परती), बस आणि दोन धुरी ट्रक (५६५ रु. एकेरी / ८५० रु. परती), तर ३ ते ६ धुरी अवजड वाहनांसाठी ६२० रुपयांपासून ८९० रुपयांपर्यंत एकेरी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सात किंवा त्याहून अधिक धुरी असलेल्या अत्यंत अवजड वाहनांना एकेरी प्रवासासाठी १०८५ रुपये तर परतीसाठी १६२५ रुपये शुल्क लागू असेल.
नशिराबाद टोल नाका (तरसोद-चिखली महामार्ग):
नशिराबाद टोलवर कार आणि जीपसाठी एकेरी प्रवास ११५ रुपये आणि परतीचा प्रवास १७० रुपये राहील. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १८५ रुपये एकेरी तर २८० रुपये परतीचा दर आहे. दोन धुरी बस व ट्रकसाठी ३९० रुपये एकेरी आणि ५८० रुपये परतीचा प्रवास असा दर निश्चित झाला आहे. याशिवाय ३ ते ६ धुरी वाहनांसाठी ४२५ ते ६१० रुपये आणि सात धुरीपेक्षा मोठ्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ७४० रुपये मोजावे लागतील.
स्थानिक वाहनधारकांना विशेष दिलासा:
सबगव्हाण आणि नशिराबाद टोलनाक्यांच्या २० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी एनएचएआयने ३६० रुपयांच्या मासिक पासची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.














Discussion about this post