जळगाव/मुंबई । राज्यात आज पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर काही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाध्याला हवामान विभागाने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे तर, मुंबई, ठाणे आणि पुण्यासग संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा आजचा अंदाज
दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
घाटमाध्याला ऑरेन्ज, कोकणला यलो अलर्ट
हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्याला पावसाच ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. या भागाती नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरसह संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.















Discussion about this post