जळगाव । जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असतानाही, निवडणूक अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात इच्छुकांची मोठी धावपळ उडाली. पहिल्याच दिवशी १६ जणांनी तब्बल २६ नामनिर्देशन पत्रांची (फॉर्म) खरेदी केली आहे.
ऐनवेळी पक्षाने तिकीट नाकारल्यास दगाफटका होऊ नये म्हणून अपक्ष किंवा डमी उमेदवार म्हणून अर्ज भरण्यासाठी नेत्यांनी ही तयारी केल्याची चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे, हे अर्ज नेमके कोणी नेले? याबाबत निवडणूक प्रशासनाने अधिकृत माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
“जोपर्यंत उमेदवार अर्ज भरून अनामत रक्कम जमा करत नाही, तोपर्यंत ही माहिती गोपनीय राहील,” अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यामुळे ‘ते सोळा जण कोण?’ यावरून जळगावच्या राजकीय कट्ट्यांवर आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी दोन्ही बाजूंकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. जळगाव हा नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि चुरशीचा जिल्हा राहिला असल्याने, इथली जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुंबईत वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. जागावाटपाचा तिढा सुटत नाही आणि हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत कोणीही उघडपणे समोर येण्यास तयार नाही. मात्र, पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता इच्छुकांनी आपले मोहरे पुढे करून अर्ज पदरात पाडून घेतले आहेत, हे मात्र पहिल्या दिवसाच्या आकड्यांवरून सिद्ध झाले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईलच, तोपर्यंत जळगावच्या या ‘गुप्त’ राजकारणावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.














Discussion about this post