भुसावळ । जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून अशातच किरकोळ वादातून जळगाव येथील तरूणाची हत्या झाल्याची घटना भुसावळच्या कंडारी शिवारात घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) या तरुणाचीकिरकोळ वादातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मृत जितेंद्र साळुंखे हे हातमजुरी करून आपल्या पत्नी व तीन मुलांसह उदरनिर्वाह करीत होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हे जळगाव शहरातील तीन जणांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका कामानिमित्त गेले होते. तिथे एका हॉटेलमध्ये मद्यपानदरम्यान चौघांमध्ये वाद झाला, जो पुढे हाणामारीत परिवर्तित झाला.
वादाच्या दरम्यान तिघांनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
या प्रकरणात माजी महापौरांचा मुलगा संशयित आरोपींमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक होईल.















Discussion about this post