मुंबई । राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि विविध खासगी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. एका अहवालानुसार राज्य सरकार खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या कामकाजाच्या तासात अतिरिक्त तास जोडण्याची योजना आखत आहे.यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापने (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, 2017 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू आहे. या कायद्यानुसार राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आदी ठिकाणांतील कामाचे तास निश्चित केले जातात.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कामगार विभागाने यासंबंधी सविस्तर माहिती सादर केली. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली असली तरी काही तरतुदींविषयी मंत्रिमंडळाने अधिक स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या या निर्णयाची अंमलबजावणी थांबवण्यात आली आहे.
प्रस्तावित बदल काय आहेत?
कामगार विभाग 2017 च्या कायद्यात जवळपास पाच महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या तयारीत असून त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे कामाचे तास वाढवण्याचा आहे.
कामाचे तास 10 करण्याचा प्रस्ताव: कायद्याच्या कलम 12 मध्ये सुधारणा करून, कोणत्याही प्रौढ कर्मचाऱ्याकडून दिवसाला 10 तासांपेक्षा अधिक काम करून घेणे किंवा त्यास परवानगी देणे शक्य होणार नाही. सध्या ही मर्यादा 9 तासांची आहे.
सलग कामाचा कालावधी वाढणार: सध्या सलग पाच तास काम केल्यानंतर अर्धा तास विश्रांती देणे बंधनकारक आहे. नव्या तरतुदीनुसार ही मर्यादा सहा तास केली जाणार असून त्यानंतरच अर्धा तास विश्रांती मिळेल.
ओव्हरटाईम तास वाढणार: तीन महिन्यांमध्ये ओव्हरटाईमची कमाल मर्यादा 125 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
दिवसातील कमाल काम 12 तास: ओव्हरटाईम धरून सध्या दिवसातील जास्तीत जास्त कामाचे तास १०.५ आहेत. ही मर्यादा 12 तास करण्याचा विचार आहे.
तातडीच्या कामासाठी बंधन नाही: तातडीच्या कामांच्या बाबतीत 12 तासांची मर्यादा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे अशा वेळेस कामावर तासांची कोणतीही कमाल मर्यादा लागू राहणार नाही.
कायद्याची व्याप्ती बदलणार: हा कायदा सध्या 10 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर लागू होतो. सुधारणा झाल्यानंतर तो 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांवरच लागू होईल.
नव्या नियमांनुसार कामगारांना मध्येच विश्रांती देणे बंधनकारक असणार आहे, जेणेकरून त्यांच्यावर जास्त कामाचा ताण पडणार नाही. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, नव्या कामगार कायद्यांनंतर महिलांना रात्री उशिरापर्यंत काम करण्याची मुभा मिळू शकते. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील.















Discussion about this post