जळगाव । मार्च महिन्याला सुरूवात होताच उष्णता वाढू लागली आहे. आतापासूनच सूर्य आग ओकण्यास सुरूवात झाली असून उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील काही भागात उष्णेतेच्या लाटेचा इशारा दिला. तर जळगाव जिल्ह्यासाठीही महत्वाचा अंदाज वर्तविला आहे.
अकोला, विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत आज रविवारी उष्णतेची लाट असेल. सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याने तेथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४०.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मालेगावमध्ये ३८.० तर नाशिक येथे ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात येते ५ दिवस तीव्र ऊन असेल. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.














Discussion about this post