नवी दिल्ली । पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा पुरवठ्याबाबत चिंता वाढली असतानाच भारत सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत कोणतीही गंभीर अडचण नसून देशातील ऊर्जा स्थिती सध्या स्थिर असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत सुमारे ४० वेगवेगळ्या देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे एका प्रदेशावर अवलंबून राहण्याचा धोका कमी झाला आहे. देशात दररोज अंदाजे ५.५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची गरज असून वार्षिक वापर सुमारे १८९ दशलक्ष मेट्रिक टन इतका आहे.
युद्धजन्य परिस्थिती असतानाही भारताकडे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अलीकडेच दोन तेलवाहू कार्गो भारतासाठी रवाना झाल्याची माहिती देत त्यांनी ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
भारताने ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी विविध मार्ग विकसित केले आहेत. सध्या जवळपास ७० टक्के कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर मार्गांनी देशात पोहोचत आहे. त्यामुळे त्या भागातील तणावाचा भारताच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम मर्यादित राहतो.
दरम्यान, देशातील पीएनजी आणि वाहनांसाठीच्या सीएनजीचा पुरवठाही नियमित सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात एलपीजी बुकिंग करण्याची गरज नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. बुकिंग केल्यानंतर साधारण अडीच दिवसांत सिलिंडर उपलब्ध होत असल्याची माहिती देत सरकारने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार केला.















Discussion about this post