अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही दिसू लागला आहे. विशेषतः कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उर्जासंकटाची परिस्थिती निर्माण होत आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत जलवाहतुकीवर निर्बंध आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार साखळीवर ताण पडला असून अनेक उद्योगांना कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातील फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्स (FMCG) क्षेत्रालाही फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे अनेक FMCG कंपन्या आगामी काळात आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. असे झाले तर तुमच्या रोजच्या वापरताली साबण, तेल तसेच इतर अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत FMCG कंपन्या उत्पादनांच्या किमतीत सुमारे 3 ते 4 टक्क्यांची वाढ करण्याचा विचार करत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पॅकेजिंग, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढला असून कंपन्यांना सध्याच्या दरात उत्पादने विकणे कठीण होत आहे.
वित्त वर्ष 2025-26 दरम्यान कंपन्यांकडे कच्च्या मालाचा साठा उपलब्ध असल्याने उत्पादनात अडथळा आला नव्हता. मात्र आता हा साठा कमी होत असल्याने आणि नवीन कच्चा माल महाग दराने आयात करावा लागत असल्याने दरवाढीचा निर्णय अपरिहार्य ठरू शकतो. दरवाढ झाल्यास साबण, शॅम्पू, खाद्यतेल, बिस्कीट यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.














Discussion about this post