नवी दिल्ली । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. आज ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद करण्यात येत असून, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद काल पूर्ण झाल्यानंतर आज अॅड. देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादात ठाकरे गटाच्या वकिलांचा मुख्य युक्तिवाद हा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत, या मुद्द्यावर केंद्रित आहे. २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
देवदत्त कामतांचा जोरदार युक्तिवाद
आज सुनावणीदरम्यान देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासह निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘चिन्हाचा निर्णय केवळ विधिमंडळातील संख्याबळ पाहून घेण्यात आला,’ असा दावा त्यांनी केला. आम्ही विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावला आहे, असेही कामत यांनी न्यायालयात म्हटले. तसेच दहाव्या अनुसूचीमध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
आपल्या युक्तिवादात कामत यांनी सुभाष देसाई प्रकरणाचा दाखला दिला. विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा दावा करत, काही परिस्थितींमध्ये सर्वोच्च न्यायालयाला आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘फूट पडली आहे की नाही, याचा सोक्षमोक्ष लावा’
विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतलेल्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतः निर्णय दिल्याची अनेक जुनी उदाहरणे असल्याचे कामत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आमदारांची मुदत संपलेली असली तरी या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेत प्रत्यक्षात फूट पडली होती की नाही, याचा न्यायालयाने सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणीही कामत यांनी केली. ‘आमच्याकडे अधिकार आहेत, यात कोणतीही शंका नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटल्याचा संदर्भही त्यांनी दिला.
आता चिन्हाच्या मुद्यावर युक्तिवाद
आजचा युक्तिवाद पूर्ण करायचा असल्याचे सांगत देवदत्त कामत यांनी आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आजच्या सुनावणीत धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावरील दाव्याबाबत ठाकरे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी विविध कारणांमुळे पुढे ढकलली जात होती. मात्र, आता नियमित सुनावणी सुरू झाल्याने या प्रकरणाच्या अंतिम निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post