हिंगोली : पिक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे कोठून आणायचे, यासाठी शेतकऱ्यांनी चक्क अवयव विक्रीला काढले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
किडनी 75 हजार, लिव्हर 90 हजार, डोळे 25 हजारांत विक्री काढल्याचे शेतकरी म्हणाले आहेत. यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असे असतांना सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, सोयाबीन, कपाशी आदी पिकांना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दुष्काळ पडला, पिक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, अनुदान नाही. अशात पीक कर्ज भरायचे तरी कसे? त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून, आमचे अवयव खरेदी करून आमचे बँकेचे कर्ज परतफेड करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.














Discussion about this post