मुंबई । विधानपरिषदेच्या आगामी ९ जागांच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपली फिल्डिंग मजबूत केली असून, शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता आहे. मात्र बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने अट घातली आहे.
काय आहे शिवसेनेची अट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर बच्चू कडू यांना आपला ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन करावा लागेल. महायुतीमधील ताकद वाढवण्यासाठी आणि शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी ही अट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बच्चू कडूंची ‘मंत्रिपदा’ची गुगली
केवळ आमदारकीच नाही, तर प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडे मंत्रिपदाचीही मागणी केली आहे. विधानपरिषदेसह बच्चू कडू यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी प्रहारची इच्छा आहे. या बदल्यात पक्ष विलीन करायचा की नाही, याबाबत आज मंगळवारी बच्चू कडू आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
उद्याची पत्रकार परिषद ठरणार निर्णायक
आज दिवसभर शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडू यांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या सर्व घडामोडींनंतर बच्चू कडू उद्या बुधवारी (२९ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन आपली अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत. प्रहार आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवणार की शिवसेनेच्या धनुष्यबाणासोबत जाणार, याचा फैसला उद्या होईल.















Discussion about this post