मुंबई । महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. या राड्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले पसार झाले होते. या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत राज्य सरकारला फटकारले होते. आता अखेर आज विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत.
“मुख्यमंत्री इतके हतबल झालेत की, ते मंत्र्यांच्या गुन्हेगार मुलांबाबत काहीच भूमिका घेत नाहीत?” अशी तीव्र प्रतिक्रिया उच्च न्यायालयाने या प्रकरणावर दिली होती. मंत्र्यांचे पसार असलेले पुत्र, गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहातात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? अशा शब्दांत कोर्टाने राज्य सरकारची कानउघडणी केली.
विकास गोगावले यांनी शुक्रवारी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. कोणालाही खबर लागू नये म्हणून विकास गोगावले महाड पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत जात त्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केले.
२ डिसेंबर २०२५ पासून आजपर्यंत विकास गोगावले पसार होते. पसार असलेल्या काळात ते कोठे होते, ते कोणाच्या संपर्कात होते, काय करत होते, त्यांना कोण मदत करत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीत विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनावर कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाड नगरपालिकाच्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच दोन डिसेंबरला एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात तुफान राडा झाला होता. माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतणे महोश व अन्य कार्यकर्ते यांच्याविरोधात महाड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी करत गुन्हे नोंदवले होते.















Discussion about this post