मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आपला पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. बच्चू कडू आज (शुक्रवारी) विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू हे आपला ‘प्रहार’ हा राजकीय पक्ष अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करतील. मात्र, त्यांची ‘प्रहार’ ही सामाजिक संघटना स्वतंत्रपणे आपले कार्य सुरू ठेवणार आहे. ज्या शिवसेनेतून बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती, अनेक वर्षांनंतर ते पुन्हा त्याच पक्षात स्वगृही परतणार आहेत.
कडूंना मंत्रिपदाचे आश्वासन?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात झालेल्या बैठकीत या विलीनीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. आगामी सहा महिन्यांत बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल आणि पक्षात मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मध्यरात्री ‘सागर’ बंगल्यावर खलबतं
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारी अर्जांबाबत सविस्तर चर्चा झाली. ही भेट आटोपल्यानंतर शिंदे पुन्हा आपल्या ‘नंदनवन’ निवासस्थानी परतले.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागांचे गणित खालीलप्रमाणे आहे:
भाजप: ५ जागा
शिंदे शिवसेना: २ जागा
अजित पवार राष्ट्रवादी: १ जागा
महाविकास आघाडी: १ जागा (ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर)















Discussion about this post