मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या भीषण अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत काय घडले याबाबत आज विधानसभेत फडणवीस यांनी भावनिक शब्दांत आठवणी सांगितल्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीयअधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली असून यंदाचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार होते. गेल्या काही दिवसांपासून ते अर्थसंकल्पाच्या तयारीत व्यस्त होते. मात्र 28 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि राज्याने एक मोठा नेता गमावला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी कधीच असा प्रसंग ओढवेल असे वाटले नव्हते, असे सांगितले.
लाडकी बहीण योजना सुरू करताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते आणि सर्वांनाही तसेच जॅकेट घालण्याचा आग्रह धरला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. शोकप्रस्ताव मांडणे ही घटनात्मक जबाबदारी असली तरी वैयक्तिकदृष्ट्या हा क्षण अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
निर्णय घेताना अजित पवार कधीही दुमत ठेवत नसत, असे सांगताना फडणवीस भावूक झाले. “काळ हे औषध असते” असे आपण म्हणतो, पण अशा दुःखावर वेळही मलम ठरत नाही, असे ते म्हणाले. सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारे शिस्तप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, हा त्यांचा आग्रह असे. 22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस असल्याची आठवण सांगत, वयाने मोठे असल्याने ते माझ्यासाठी दादा होते, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.















Discussion about this post