धरणगाव । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून अशातच अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी बायपास जवळील विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर घडलीय. भूषण संभाजी माळी (वय-२९, रा. पिंपरखेड ता.भडगाव) असे मयत तरूणाचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भूषण माळी हा तरुण आपल्या परिवारासह सह भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे वास्तव्याला होता. २७ ऑगस्ट रोजी भूषण माळी हा शिरसोली येथे राहणाऱ्या बहिणीकडे भेटण्यासाठी आला होता. रात्रीचे जेवण केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास भूषण हा दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला होता. पाळधी बायपास जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती.
या अपघातात भूषण माळी याचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर धरणगाव पोलिसांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला होता. दरम्यान सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मयत भूषण माळी यांची बहीण भारती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.
Discussion about this post