रावेर । जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्यात रावेर तालुक्यात केळीची सर्वाधिक लागवड होत असते. असे असताना प्रधानमंत्री फळपीक विमा योजना मागील वर्ष २०२२-२०२३ मधील नुकसान भरपाईची रक्कम मुदत संपून चार महिने होऊनही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे रावेर तालुक्यातील तांदलवाडी फाट्यावर तालुक्यातील सुनोदा, मस्कावद आणि मंगलवाडी येथील सुमारे तिनशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी पीकविमा भरपाई मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत फलक झळकवले व आपला तीव्र संताप व्यक्त केला.
तसेच पीकविम्याची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी, नेते, आमदार, खासदार, यांना गावबंदी असून आगामी येणाऱ्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवडणुका जवळ असल्याने काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तातडीने भरपाईची रक्कम न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असाही निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. वारंवार अर्ज देऊन, कृषी विभागाकडे तक्रार देऊन, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तसेच सर्व पक्षाच्या नेऱ्यांना भेटूनही न्याय मिळत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन ‘राजकीय नेत्यांना गावबंदी’ असे टोकाचे पाऊल उचलले आहे.















Discussion about this post