जळगाव । सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांसह मिठाई व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या विविध उपाययोजनांनंतर आता साखरेच्या बाजारभावात घट होताना दिसत आहे. २२ ऑगस्टच्या तुलनेत आता साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १४ ते १६ रुपयांची घट झाली आहे. या घसरणीचा परिणाम आगामी काळात जळगावसह राज्यातील किरकोळ बाजारातही जाणवण्याची शक्यता आहे.


काही दिवसांपूर्वी साखरेच्या दराने अचानक मोठी उसळी घेतली होती. ऐन सणासुदीच्या काळात दर वाढल्याने घरगुती ग्राहक तसेच मिठाई, बेकरी आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांसमोर वाढीव खर्चाचे आव्हान निर्माण झाले होते. साखरेच्या दरवाढीमुळे मिठाईच्या किमती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती.बाजारभावानुसार २२ ऑगस्ट रोजी साखरेचा दर सुमारे ७० रुपये किलो होता. त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत तो सुमारे आता ५५ ते ५७ रुपये किलोवर आला.
जळगावातील मिठाई व्यावसायिकांना दिलासा?
गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी यांसारखे सण जवळ येत असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. जळगाव शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांसाठी साखरेच्या दरातील घसरण महत्त्वाची ठरणार आहे. साखरेचा उत्पादन खर्च कमी झाल्यास मिठाई आणि इतर गोड पदार्थांच्या किमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. दर वाढल्यानंतर काही व्यावसायिकांना उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या होत्या. आता साखरेचे दर कमी होत असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळतो का, याकडे जळगावातील ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, साखरेच्या दरातील ही घसरण आगामी काळात कायम राहते का आणि जळगावच्या किरकोळ बाजारात त्याचा प्रत्यक्ष परिणाम किती प्रमाणात दिसून येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post