पाचोरा : शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्याचे पैसे न देता सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
कापूस व्यापारी हरिदास मोहनलाल ठक्कर (५८, रा. आशीर्वाद ड्रीम सिटी, पाचोरा), हर्ष ठक्कर व त्यांचा जावई यश योगेश ठक्कर (रा. गणेश कॉलनी, जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी यश ठक्कर यास अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, तारखेडा व परिसरातील २१ शेतकऱ्यांनी १५ मार्च रोजी कापसाची विक्री या व्यापाऱ्यांना केली होती. त्यावेळी त्यांनी १ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचा कापूस खरेदी केला आणि त्यापोटी चेक दिले. मात्र ते वटले नाहीत. यश ठक्कर याला पहाण येथील ज्ञानेश्वर भिका महाजन या शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली आहे. पहाण येथील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून याच व्यापाऱ्यांनी ३८ लाखांची फसवणूक केली आहे. तारखेडा येथील शेतकऱ्यांपैकी एकाने १ जून २०२६ रोजी दिलेला धनादेश बँकेत वटविण्यासाठी जमा केला असता संबंधित खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे तसेच खाते बंद असल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाच्या पैशातून सोने खरेदी करून ते पाचोरा येथील खासगी फायनान्समध्ये ठेवण्यात आले. तसेच हरिदास ठक्कर फरार होण्यापूर्वी त्याच्या नावावरील गोल्ड लोन त्याचा जावई यश ठक्कर याच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व व्यवहारांची एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ४६ हजार ८१० रुपये व पहाण येथील शेतकऱ्यांची ३८ लाखांची रक्कम आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.














Discussion about this post