मालेगाव : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात बुधवारी भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल २३ प्रवासी जखमी झाले आहेत. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा एसटी बस ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन मालेगावहून चाळीसगावच्या दिशेने जात होती. दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकशी बसची समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने धडकेची तीव्रता मोठी होती. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये आरडाओरड आणि गोंधळ उडाला.
या अपघातात इरशाद बी रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला.
२३ प्रवासी जखमी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने मालेगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेन्द्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेन्द्र ततार (५७) तिघेही रा. संगमेश्वर, मालेगाव, ऋतुजा शुभम सोनजे (२४, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०) दोघेही रा. नाशिक, सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) दोघीही रा. मालेगाव आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०, टिंगरी, मालेगाव) यांचा समावेश आहे.
वाहतूक विस्कळीत; पोलिसांचा तपास सुरू
या अपघातामुळे मालेगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जखमी प्रवाशांच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post