जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर
‘महास्ट्राईड’मध्ये जळगाव जिल्हा राज्यात अव्वल; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वात १०० टक्के गुणांकन, १६ कोटींच्या प्रोत्साहनपर निधीसाठी पात्र
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात अधिकारी-कर्मचारी, जवान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव | समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असून, शेतकरी, महिला, युवक, कामगारांसह सर्वसामान्यांच्या सक्रिय सहभागातून जिल्ह्याची विकासाची वाटचाल वेगाने सुरू आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याला सर्वोच्च प्राधान्य असून, समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचा परिवार, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, स्वातंत्र्यवीरांच्या त्याग आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्ये दिली. या मूल्यांची जपणूक करीत आपल्या कर्तृत्वातून जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासाला हातभार लावणे हीच आजच्या पिढीची खरी राष्ट्रसेवा आहे. देशाच्या प्रगतीत शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योजक, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि जवानांसह समाजातील प्रत्येक घटकाचे मोलाचे योगदान राहिले आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीतही शेतकऱ्यांचे कष्ट, कामगारांचे श्रम, महिलांचा सहभाग, युवकांची ऊर्जा आणि नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
‘महाराजस्व’ शिबिरांतून दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ दरम्यान महसूल मंडळ स्तरावर ९६ शिबिरांतून १ लाख ९ हजार ८२४ लाभार्थ्यांना, तर २२ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान ११ विधानसभा मतदारसंघनिहाय शिबिरांतून १ लाख ९ हजार ६९३ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
महिला-बालकांची सुरक्षा आणि आरोग्याला प्राधान्य
जिल्ह्यात महिला व बालकांच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत १२४ अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आली असून, त्यापैकी सात बालकांना या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत संधी मिळाली असून‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, मानसिक व सामाजिक समुपदेशनासह आवश्यक सहाय्य आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. चालू वर्षात ३१६ महिलांना या सेवांचा लाभ मिळाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम १ एप्रिल २०२६ पासून लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, ९४५ गावे क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आली आहेत.
‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’चा संकल्प
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने युवकांना विशेष आवाहन करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “युवकांनी आपली ऊर्जा व्यसनात नव्हे, तर शिक्षण, क्रीडा, कौशल्य, नवउद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी.” ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ या संकल्पनेतून ‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’ घडविण्यासाठी युवक, पालक, शिक्षक, सामाजिक व धार्मिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
दि. १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित ‘जलसंधारण सप्ताह’ तसेच २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन — वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘महास्ट्राईड’ मध्ये जळगावची राज्यात अव्वल कामगिरी
राज्य शासनाच्या ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत कामगिरी निकषांच्या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने १०० टक्के एकत्रित गुणांकन प्राप्त करून राज्यातील सर्वोच्च गुणांकनाच्या स्तरावर कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जळगाव जिल्हा १६ कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीसाठी पात्र ठरला आहे. या यशाबद्दल पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, त्यांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचविणे आणि विकासकामांमध्ये गुणवत्ता व गतिमानता राखणे या प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्ह्याची कामगिरी उंचावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मृद व जलसंधारण तसेच जलसंवर्धनाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन — वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
कर्तृत्वाचा गौरव; जवानास ताम्रपट पदक
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान करण्यात आला. देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत शत्रूंशी झालेल्या गोळीबारात अपंगत्व आलेले पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील सीआरपीएफ कॉन्स्टेबल तथा युनिट चालक जावीद अहमद शेख यांना राज्य शासनाकडून प्राप्त ताम्रपट पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यासह २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक, अति उत्कृष्ट सेवा पदक, विशेष सेवा पदक तसेच पोलीस पदकाने गौरविण्यात आले. विविध स्पर्धा व उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
समारोपप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि जिल्हावासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचा अभिमान आणि संविधानाच्या मूल्यांचा सन्मान जपत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातून जिल्ह्याच्या व देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून विकसित जळगाव आणि विकसित भारताचा संकल्प साकार करूया, असे आवाहन त्यांनी केले.













Discussion about this post