नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले असून, संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली असून, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
या घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर महत्त्वाची घोषणा करत NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. अशा प्रकरणांचा जलद निकाल लागावा यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जाईल. संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
मोदी यांनी पुढे स्पष्ट केले की, तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले असून, दिल्लीतील जंतर-मंतर परिसर आणि संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनकर्ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असून, सरकारने याप्रकरणी अधिक ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.
पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी आंदोलनकर्त्यांनी दोषींवर तातडीने कारवाई आणि जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी धरण्याची मागणी कायम ठेवली आहे.















Discussion about this post