पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात शाळेच्या व्हॅनला भरधाव प्रवासी रेल्वेने जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे फाटकावर घडली. सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन खासगी शाळेची व्हॅन शाळेकडे जात असताना रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात निमतिता–काटोया पॅसेंजर ट्रेनने व्हॅनला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की व्हॅनचा चक्काचूर झाला.
अपघातावेळी व्हॅनमध्ये चालकासह आठ जण प्रवास करत होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि कर्णसुबर्ण ब्लॉक रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना पुढील उपचारासाठी मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
फाटक खुले असल्याने दुर्घटना?
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रेल्वे क्रॉसिंगच्या एका बाजूचे फाटक बंद होते, मात्र दुसऱ्या बाजूचे फाटक उघडेच राहिल्याने व्हॅन चालकाने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भरधाव ट्रेन आल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे फाटकावरील गेटमनने वेळेत फाटक बंद न केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून सर्व बाबींची सखोल तपासणी केली जात आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे शाळा परिसरात शोककळा पसरली असून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.















Discussion about this post