मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले हिचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्याने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिताच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून सर्व बाबींची चौकशी करण्यात येत असून अधिकृत अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
संचिता उगलेने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य मध्ये तिने साकारलेली दिया टंडन ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिला आणखी काही मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने दिलवाली दुल्हा ले जाएंगे या मालिकेत देखील काम केले आहे.
छावा सिनेमात साकारली भूमिका
टीव्ही व्यतिरिक्त संचिताने चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्रकल्पांमध्येही काम केले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच ती ‘साइलन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या चित्रपटाचा देखील भाग होती. या चित्रपटात अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.
2025मध्ये आत्महत्येवर केले होते मोठे विधान
मे २०२५ मध्ये, संचिताने इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवाल हिच्या मृत्यूबाबत भाष्य केले होते आणि सोशल मीडियाचे व्यसन तसेच ऑनलाइन मान्यतेचा (व्हॅलिडेशनचा) दबाव यांबाबत चिंता व्यक्त केली होती. या घटनेला हृदयद्रावक म्हणत ती म्हणाली, “तरुण मुले आपल्या आयुष्याबद्दल किती सहजपणे विचार करतात, हे पाहून मला खूप दुःख झाले आहे.”















Discussion about this post