मुंबई । जूनचा अर्धा महिना संपत आला तरी महाराष्ट्रात अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. वाढता उकाडा आणि लांबलेल्या पावसामुळे जनता आधीच त्रस्त असताना, आता मान्सूनबाबत एक अत्यंत चिंताजनक अपडेट समोर आली आहे. यंदा केवळ जूनच नाही, तर जुलै महिनाही कोरडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘सुपर अल निनो’च्या धोक्यामुळे महाराष्ट्राला यंदा ‘न भूतो न भविष्यती’ अशा भीषण पाणीटंचाईचा (पाणीबाणी) सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाच्या या गंभीर परिस्थितीवर बोलताना जनतेची चिंता अधिक वाढवली आहे. ते म्हणाले, “माणूस अजून निसर्गावर मात करू शकलेला नाही. माणूस रक्त आणि पाणी स्वतः बनवू शकत नाही. पाऊस पडला तरच पाणी मिळणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी हवामान अंदाजाचा दाखला देत सांगितले की, “जून आणि जुलै महिना कोरडा जाईल असा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल असं कळतंय. पण जर ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली नाही आणि धरणं भरली नाहीत, तर पुढच्या वर्षी थेट जानेवारी महिन्यापासूनच मोठी पाणी कपात करावी लागेल. सरकार म्हणजे काही परमेश्वर नाही.” चंद्रकांत पाटील यांच्या या विधानामुळे नागरिकांना आतापासूनच पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याचे संकेत मिळाले आहेत.
एरवी जूनच्या सुरुवातीलाच कोसळणाऱ्या कोकणात यंदा पावसाने निराशा केली आहे. मान्सून दाखल झाला असला तरी त्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. कडक ऊन, ढगाळ हवामान आणि असह्य उकाड्यामुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. “मान्सून इलो, पण मिरग (मृग नक्षत्र) कोरडोच गेलो,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया स्थानिक कोकणी माणूस व्यक्त करत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.
तळकोकणात नद्या-नाले कोरडे; भात पेरण्या खोळंबल्या
केरळ ते तळकोकण असा वेगवान प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग सध्या सिंधुदुर्गात पूर्णपणे मंदावला आहे. परिस्थिती एवढी बिकट आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाले कोरडे पडले आहेत. पाऊस नसल्यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी कशीबशी भात पेरणी झाली आहे, तर अनेक भागात पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांनी भात पेरण्या थांबवल्या आहेत.














Discussion about this post