जळगाव | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जलस्रोतांचे नियोजन, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, विहिरींचे अधिग्रहण तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू असल्याचे प्रशासनातर्फे कळविले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सध्या 13 गावांमध्ये 20 खासगी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील 3 गावे, भुसावळ तालुक्यातील 1 गाव, अमळनेर तालुक्यातील 8 गावे आणि पारोळा तालुक्यातील 1 गाव यांचा समावेश आहे. या गावांतील सुमारे 1 लाख 19 हजार 606 नागरिकांना या उपाययोजनांचा लाभ होत आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात 56 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, त्यापैकी सर्वाधिक 14 विहिरी मुक्ताईनगर व 14 अमळनेर, 11 जामनेर तालुक्यात विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील 10 ठिकाणी टँकरसाठी स्वतंत्र उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, चाळिसगाव, भडगाव आणि चोपडा या तालुक्यांमध्ये सध्या कोणत्याही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासलेली नाही.
प्रशासनाकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना पुरेसा व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्परतेने राबविल्या जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post