मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच, पक्षात अनावश्यक हस्तक्षेप किंवा शिस्तभंग सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
मंत्री, आमदार, खासदार आणि शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक निर्णय घेतला जाईल. पक्षाची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि आवश्यकता भासल्यास कठोर निर्णय घेण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही.
संघटन बळकट करण्यासाठी गावागावात आणि प्रत्येक बूथवर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि युवा कार्यकर्त्यांची ऊर्जा यांचा समन्वय साधत पक्ष विस्ताराला गती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांना पक्षात योग्य सन्मान आणि संधी दिली जाईल, असे आश्वासन देताना त्यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच्या चार महिन्यांचा उल्लेख केला. या काळात प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा आणि योगदान लक्षात घेतले असून योग्य वेळी प्रत्येकाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी स्पष्ट केले की, दिवंगत अजित पवार यांनी पक्षातील प्रत्येकाला जपण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षहिताला धक्का पोहोचेल अशा बाबींमध्ये ते कठोर निर्णय घेण्यासही मागे हटले नाहीत. त्याच परंपरेनुसार पक्षाच्या भविष्यासाठी आवश्यक असेल तर कठोर भूमिका घेण्यास आपणही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
महामंडळे आणि विविध संस्थांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्यांनी पक्षनिष्ठा, गुणवत्ता आणि पात्रता यांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. पक्ष विस्तारासाठी काहीवेळा बाहेरच्या नेत्यांना स्थान द्यावे लागते, मात्र त्याचवेळी जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान अबाधित ठेवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सुनेत्रा पवार यांच्या या भाषणानंतर पक्षातील शिस्त, आगामी संघटनात्मक बदल आणि नेतृत्वाच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.














Discussion about this post