इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध थांबवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू होती, मात्र या चर्चेतून काहीही ठोस निष्पन्न झाले नाही. दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर युद्धाचा भडका उडाला आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवर भीषण हल्ले सुरू केले असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत सावध पवित्रा घेतला असून इराणमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची नियमावली जारी केली आहे.
इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी. सतर्क राहावे, असे भारतीय प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावे, असेही भारताने सूचवले आहे. भारतीय नागरिकांनी सध्या इराणची यात्रादेखील करू नये, इराणला जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय प्रशासनाने दिला आहे.
तेहरान येथील भारतीय दूतावासाने या सूचना जारी केल्या आहेत. “सध्याची इराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही भारतीयांनी इराणमध्ये जाण्याचे टाळावे, असा सल्ला देत आहोत. सध्या जे भारतीय नागरिक इराणमध्ये आहेत, त्यांनीदेखील लवकरत लवकर कोणत्याही मार्गाने इराण देश सोडावे,” असेदेखील इराणमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.
इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष का पेटला?
दरम्यान, एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेदेखील इराणवर प्रत्युत्तरादाखल मोटे हल्ले केले. इस्फहान, करज, तबरीज, तेहरान या भागात हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने तेहरान येथील इमाम खुमैनी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post