चाळीसगाव : तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या जातीय स्वरूपाच्या गंभीर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे संबंधित प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाईची मागणी करण्यात आली.
१४ एप्रिल २०२६ रोजी टाकळी येथे मिरवणुकीदरम्यान काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित करून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत महिला व युवक जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संबंधितांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला.
घटनेबाबत मेहुनबारे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना चाळीसगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात येऊन तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच संदीप कांबळे यांना अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून धमकी दिल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पंचनामा केला असला तरी अद्याप अधिकृत तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि टाकळी येथील बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, दगडफेक करणारे आरोपी अद्याप मोकाट असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यावर भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपींना अटक, खोटे गुन्हे मागे घेणे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, दगडफेक प्रकरणातील आरोपींना अटक, तसेच संदीप कांबळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. २८ एप्रिल २०२६ रोजी काढण्यात आलेल्या या जनमोर्चाद्वारे प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.















Discussion about this post