उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील रामनगर-कघोट परिसरात आज सकाळी भीषण बस अपघात झाला. प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटी होऊन 17 जणांचा मृत्यू झाला असून 31 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस रामनगरहून उधमपूरकडे जात असताना डोंगराळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर परिसरात एकच आरडाओरडा सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी रेस्क्यू ऑपरेशन वेगाने राबवत जखमींना रुग्णालयात हलवले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.















Discussion about this post