देशात विमान अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने देशात खळबळ उडाली. यानंतर आता पुन्हा विमान अपघाताची भीषण घटना समोर आलीय. झारखंडमधील रांचीहून दिल्लीकडे निघालेले एअर मेडिकल ॲम्बुलन्स विमान अचानक कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला.
बिरसा मुंडा एअरपोर्ट येथून उड्डाण घेतलेल्या या विमान अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णाला उपचारासाठी नेत असताना घडलेल्या या घटनेने हवाई वैद्यकीय सेवांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रशासन तपास करत आहे.
हे विमान झारखंडमधील चतरा आणि लातेहार जिल्ह्याच्या सीमाभागात कोसळले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 23 मिनिटांत विमानाचा संपर्क तुटला. अधिकृत माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेजचे बीचक्राफ्ट C90 (VT-AJV) हे विमान सायंकाळी 7:11 वाजता Birsa Munda Airport येथून दिल्लीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर सुमारे 7:34 वाजता विमानाचा कोलकाता एटीसीशी संपर्क तुटला. रडारवरून गायब होताना विमान वाराणसीच्या सुमारे 100 नॉटिकल मैल आग्नेय दिशेला असल्याचे सांगण्यात आले.
दुकानातील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जखमी झालेल्या संजय कुमार यांना रांचीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले होते. रुग्णाच्या कुटुंबीयांनी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून एअर ॲम्बुलन्स बुक केली होती. मात्र रुग्णासह विमानातील दोन पायलट आणि डॉक्टर यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हवामान आणि उड्डाण स्थितीचा आढावा घेऊन तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.















Discussion about this post