चोपडा – आदिवासी जनजाती समाजाचा इतिहास प्रेरणादायी, गौरवशाली आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्ती देशात कृत्रिम धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हाने निर्माण करत आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी विचारमंथनाची गरज असून, आदिवासी बांधव हिंदू संस्कृती आणि परंपरेचे पुरातन वारसदार आहेत, ही संस्कृती जपली पाहिजे, असे मत राष्ट्रीय संस्कार केंद्राचे प्रांत संयोजक प्रकाश गेडाम यांनी व्यक्त केले. ते भगवान बिरसा मुंडा सार्धशती (१५० वी जयंती) निमित्त आयोजित जनजाती चेतना परिषदेत बोलत होते.
चोपडा शहराजवळील खेतेश्र्वर हॉल येथे ही परिषद पार पडली. प्रारंभी भगिनी मंडळ संचलित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक दत्ता पावरा यांनी केले, तर परिचय दिनेश बारेला यांनी करून दिला.
परिषदेच्या पहिल्या सत्रात “जनजाती गौरवशाली इतिहास, परंपरा व विकार” या विषयावर प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात “धर्ती के आबा भगवान बिरसा मुंडा यांचे चरित्र” या विषयावर देवगिरी प्रांत सहचिव काशिराम बारेला यांनी विचार मांडले. तिसऱ्या सत्रात “जनजाती अस्मिता व अस्तित्व” या विषयावर पश्चिम क्षेत्र सह हितरक्षा प्रमुख युवराज लांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून आदिवासी बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रविण पाटील यांनी मानले.















Discussion about this post